
मुंबई, दि. ९ जून : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, संबंधित विभागीय अधिकारी, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील विविध विद्यापीठांचे एनएसएस संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह ६७० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
मंत्री पाटील म्हणाले की, नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान आहे. १० जून या जागतिक नेत्रदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. नेत्रदान जनजागृती उपक्रमांसोबत नेत्रतपासणी व नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करून हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा आणि समाजातील नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करावे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम‘ या देशव्यापी अभियानाचा प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आईच्या सन्मानार्थ आणि आईच्या नावाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणे, हरित आवरण वाढवणे आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा एक उद्देश असून हे अभियान एक मोठी जनचळवळ बनली आहे. त्यामुळे ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व महाविद्यालयांमध्ये २१ जून रोजी योग मार्गदर्शन, योगाभ्यास शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ
