Pune | Wed, 10 June 2026

Ad

पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड. आशिष शेलार

Sunil Goyal | 3 views
पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ९ : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटीबद्ध आहे. हा उपक्रम शासन, अध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एक लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्मल वारी आणि हरित वारी उपक्रमाच्या आढावा बैठकीत दिले.

बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी पंढरपूर संस्थानचे विश्वस्त तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी केलेल्या विनंतीची प्राधान्याने दखल घेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उपक्रमाचे मार्गदर्शक शिवाजी महाराज मोरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभिजीत औटे, वन विभागाचे विवेक खांडेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवा सहयोग फाउंडेशनचे अतुल नागरस व नरेंद्र वैशंपायन हेदेखील उपस्थित होते.

राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर वारकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरित पट्टे विकसित करण्यात येत आहेत. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान जेवढे डॉट बॉल पडतील, तेवढे वृक्ष लावण्याचा लोकहितकारी उपक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने हाती घेतला आहे. या उपक्रमातूनही या पालखी मार्गाचे हरितीकरण शक्य असल्याची सूचना मोरे यांनी यावेळी केली. त्यानुसार मंत्री ॲड. शेलार यांनी तात्काळ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांचा विचार प्राधान्याने करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाचा सामना आणि ग्रामीण रोजगार निर्मितीच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातूनही पालखी मार्गाचे हरितीकरण शक्य असल्याची सूचना मोरे यांनी केली. त्यांच्या याही सूचनेची दखल घेत मंत्री ॲड. शेलार यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्याशी संपर्क साधून वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांचा विचार प्राधान्याने करण्याची सूचना केली.

यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा उभारताना वृक्ष कापावे. लागल्यास, संबंधित विकासकास अन्यत्र वृक्षलागवड करणे अनिवार्य असते. अशा प्रकारच्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातूनही पालखी मार्गांचे हरितीकरण प्राधान्याने पूर्ण केले जावे. शासन, आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वारकरी यांचा सक्रिय सहभाग घेऊन हा प्रकल्प जनहिताची लोकचळवळ म्हणून यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कल्याणकारी उपक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना मंत्री शेलार यांनी यावेळी केल्या.

पालखी मार्गांवर सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच त्यांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी मंत्री शेलार यांनी दिले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पायी वारी करताना अधिक दिलासा मिळणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. वारकरी परंपरा, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

ooo

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp