
नवी दिल्ली, दि. १९ : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘लोकोत्सव’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचा प्रारंभ निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांसह दिल्ली व परिसरातील महाराष्ट्रप्रेमी नागरिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ‘लोकोत्सवा’त अमित घरत ग्रुप,मुंबई यांनी महाराष्ट्रातील विविध लोककला, पारंपरिक लोकनृत्य, लोकगीत आणि वाद्यसंगीत यांचे रंगतदार सादरीकरण करण्यात आले. लावणी, गोंधळ, कोळी नृत्य, तसेच ढोल-ताशांच्या गजरात सादर झालेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कलांचे वैशिष्ट्य देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश असलेली सांस्कृतिक एकात्मता आणि परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाणीला या कार्यक्रमामुळे अधिक बळ मिळाले.

०००
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
