
मुंबई, दि. १८ : अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली २ एप्रिलपासून माऊंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या चमूला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथून झेंडी दाखवून रवाना केले. ‘गिरीप्रेमी’ या संस्थेतर्फे ‘माऊंट एव्हरेस्ट मोहीम २०२६’ या पन्नास दिवसांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘गिरीप्रेमी’ हे संस्थेचे नाव जसे सुंदर आहे तसेच हिमनदीच्या रक्षणासाठी संस्था करीत असलेले पर्यावरण जागृतीचे काम देखील कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी काढले.

हिमालय केवळ पर्वतराज नसून हिमालय आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. हिमालय संस्कृतीचे जिवंत प्रतीक असून त्याचे संवर्धन व रक्षण झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः माऊंट एव्हरेस्ट चढू शकत नाही. त्यामुळे गिर्यारोहकांच्या अनुभवातूनच एव्हरेस्ट समजून घेऊ शकतो असे सांगून राज्यपालांनी शिखर सर करुन आल्यावर पुन्हा आपणांस भेटण्यास यावे, असे गिर्यारोहकांना सांगितले.
यावेळी गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, भूषण हर्षे, प्रसाद जोशी, चंदन चव्हाण व अजित ताटे आदी गिर्यारोहण क्षेत्राशी निगडित संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘गिरीप्रेमी’चे संस्थापक उमेश झिरपे यांच्यासह गिर्यारोहक विवेक शिवदे, निकुंज शहा, मिहीर जाधव व अखिल कारकर यंदाच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत आहेत.
००००
