Pune | Thu, 14 May 2026

Ad

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

Sunil Goyal | 6 views
जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ चा समारोप समारंभ संपन्न झाला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, जलसाक्षरतेसाठी काढण्यात आलेली ‘गोदावरी-नर्मदा जलदिंडी’ ही केवळ एक यात्रा नसून, ते जलसंधारणाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाचा जो वारसा दिला, तोच पुढे नेत सिंचन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या सूत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांना जलसाक्षर करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त समन्वयाने हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यात आला.

000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp