
सोलापूर, दि. २० (जिमाका): सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सुधारित सॉफ्टवेअर तयार करून आधार केंद्रांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून अद्यावत आधार संच तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने आधार संच वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठ येथे ठेवण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच आधार केंद्रांना आधार संचचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. शेलार यांनी पुढे सांगितले की, शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून १००० सेवा थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३१ आधार केंद्रांपैकी १०६ किट वितरित झाले असून, प्रतिनिधिक स्वरूपात पाच किट आज देण्यात आले. उर्वरित २५ किट एप्रिल-मे महिन्यात वितरित करण्यात येणार आहेत.

उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांनी आधार संचाबद्दल माहिती देऊन सांगितले की, या किटमुळे आधार नोंदणी करताना कमीत कमी अडचणी येतील आणि कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे, तहसीलदार निलेश पाटील तसेच इतर पदाधिकारी, आधार केंद्र चालक व कर्मचारी उपस्थित होते.
०००
