Pune | Tue, 17 March 2026

Ad

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Sunil Goyal | 11 views
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

कोकणातील मराठी शाळांच्या संवर्धनासंदर्भात तसेच शिक्षण खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सामंत, महेंद्र दळवी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, शाळांचे समायोजन करताना कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पहिली ते नववीपर्यंत किमान दोन विद्यार्थी असले तरी शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अल्प असल्यास त्यांना जवळच्या शाळेत वर्ग केले जाते.

विद्यार्थ्यांना शिक्षणस्नेही वातावरण निर्माण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हा शासनाचा उद्देश आहे. शाळांचा पट वाढवण्यासाठी शिक्षकांनीही सकारात्मक व विशेष उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. कोकण विभागातील भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन शिक्षक पदे भरणे, मराठी व उर्दू भाषेतील शिक्षक उपलब्ध करून देणे आदी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp