Pune | Tue, 17 March 2026

Ad

येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – मंत्री छगन भुजबळ

Sunil Goyal | 22 views
येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – मंत्री छगन भुजबळ

  • पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत
  • विविध विकास कामांचा मंत्री भुजबळ यांच्याकडून आढावा

नाशिक, दि.१९ (जिमाका): आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच येवला मतदारसंघात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला येथे संपर्क कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे, येवला प्र.तहसीलदार पंकज नेवसे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले,  एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता इमरान शेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र भाबड, सहाय्यक निबंधक रमेश गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके, उपअभियंता प्रशांत कुलकर्णी, एस.एम.पाफळ, येवला तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, उन्हाळ्याच्या दृष्टीने ज्या गावांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे त्यांच्या मागणी अर्जानुसार टँकरचे नियोजन करण्यात यावे. तालुक्यातील घरकुल कामांसाठी आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त करून कामांना गती देण्यासाठी एकत्रित बैठकीचे नियोजन करावे. पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत तसेच मंजूर गेटची कामेही सुरू करावीत. शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्याचे नियोजन करावे. विंचूर लासलगाव रस्त्याची कामे खंड न पाडता समन्वयातून सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

येवला पोस्ट ऑफिस, सखी वन स्टॉप सेंटर व अल्पसंख्यांक महाविद्यालय यासाठी शासकिय जमीन उपलब्ध करून द्यावी. शहरातील शॉपिंग कॉम्लेक्स इमारत क्रमांक २ साठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात यावी. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याची कामे शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावावीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेनुसार अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत ठेवावी. महावितरणने विजेबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे असे सांगत भरवस फाटा ते कोपरगाव हद्द काँक्रीट रस्ता, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आदी कामांचा आढावा यावेळी मंत्री भुजबळ यांनी घेतला.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp