
सातारा दि. १५: आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना केली. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता व्हावे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे प्रयोग महत्त्वाचे ठरणार आहेत.
श्री. गडकरी पुढे म्हणाले की, देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने येणार असून त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधन आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल. तसेच पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या तीन वर्षांत देशातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी पाणी संवर्धनावर विशेष भर दिला. पाणी हीच खरी संपत्ती आहे. जलसंधारणावर लक्ष दिल्यास शेतीचा विकास होऊन ती अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
बायो इंधनाचा पर्याय सर्वांनी स्वीकारावा. लवकरच विमान वाहतूक क्षेत्रात बायो इंधनाचा वापर सुरू होईल. यामुळे भारत इंधन आयात करणारा नाही तर इंधन निर्यात करणारा देश होईल. देशात लवकरच वेस्ट प्लॉस्टीक पासून रस्ते बनविण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
