
- महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान – वित्त राज्यमंत्री ॲङ जयस्वाल
- वस्तु व सेवा कर इमारतीचा लोकार्पण सोहळा

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान मोलाचे – वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल
चंद्रपूर हा उद्योग आणि वनसंपदेने नटलेला तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच सरकारच्या तिजोरीकरिता चांगले उत्पन्न दिले आहे. त्यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ‘विकसित भारत – २०४७’ चा रोडमॅप तयार केला असून, यात आपल्या राज्याचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. गडचिरोलीचे उत्पन्न पहिल्या पाच जिल्ह्यांत आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. या इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून, त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
महसूल लक्षांक पूर्ततेत चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर
प्रास्ताविकात राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी माहिती दिली की, सदर इमारत चार मजली असून या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण २९ कोटी ९९ लक्ष ८० हजार रुपये खर्च झाले आहेत. ही इमारत चंद्रपूर विभागाचे मुख्यालय असून या अंतर्गत चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली हे तीन जिल्हे येतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत चंद्रपूर विभागाने सुमारे १४५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा केला आहे. लक्षांक पूर्ततेच्या टक्केवारीत १२२ टक्के कामगिरी करत चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच फित कापून सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले. या सोहळ्याला राज्यकर सहआयुक्त संजय पवार, प्रशांत पाटील, संजय सायगण, सहाय्यक राज्यकर आयुक्त तेजराम मडावी, भूषण शहाणे, संतोष हेमणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
