
मुंबई, दि. १७ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला ‘महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच भाग म्हणून २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे महिलांच्या तक्रारी व अडचणींना शासकीय पातळीवर त्वरित प्रतिसाद देऊन त्यांचे निवारण करणे, तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. महिला लोकशाही दिनासाठी तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८ येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक महिलांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज, सेवा किंवा आस्थापनाविषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांच्या हक्कांचे संरक्षण, न्याय मिळवून देणे आणि त्यांना सुलभ मार्गदर्शन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ
