
मुंबई, दि. १४: शासन नागरिकांसाठी आहे. घरबसल्या शासनाच्या सर्व ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊन वेळ आणि पैशांची बचत करावी, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आयोजित शेवटच्या शिबिरात त्या बोलत होत्या.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी नागरिकांना एकाच छताखाली सेवा पुरवल्या. महाराजस्व अभियान हा केवळ शिबिरापुरता मर्यादित उपक्रम नसून सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शिबीरे संपल्यानंतरही दाखले वाटप व इतर सेवा नियमित सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर अनेक सेवा उपलब्ध आहेत. नागरिकांनी, विशेषतः तरुण पिढीने, ऑनलाईन अर्ज करून या सेवांचा लाभ घ्यावा. बहुतांश सेवासाठी योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास ठराविक कालमर्यादेत प्रमाणपत्र उपलब्ध करणे ही प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे, असे जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबत यावेळी जिल्हाधिकारी यांनी घराघरात जाऊन काम करणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, २००२ च्या मतदार यादीतील आपली नोंद शोधून तयार ठेवावी आणि ‘वोटर सर्विस पोर्टल’ चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी उपस्थितांना केले.
महाराजस्व समाधान शिबिरात महसूल विभागासह इतर विविध विभागांच्या स्टॉलवरून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, योजनांची माहिती आणि लाभ देण्यात आले. यावेळी मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, प्रशांत पानवेकर, महेश हरिश्चंद्रे तहसीलदार राजेश वैष्णव, संकेत यमगर आदी उपस्थित होते. नागरिकांना माहिती देण्यासाठी तसेच सेवा पुरविण्यासाठी येथे जवळपास २८ वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सला जवळपास ४५० नागरिकांनी भेट दिली. प्रत्यक्ष लाभ ६७ नागरिकांना तर १२२ नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास ६५० नागरिकांना शिबिराचा लाभ मिळाला.
००००
