
मुंबई,दि.28: ‘पानी फाऊंडेशन’मार्फत 2022 पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात 46 तालुक्यांत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशनच्या प्रयत्नांना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यांत शेतकऱ्यांसाठी काम करत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ चा शुभारंभ सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 मार्च 2025 रोजी फार्मर कप 2024 मधील शेतकरी गटांना सन्मानित करताना फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात 351 तालुक्यांत विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, ग्रामविकास मधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद व पानी फाऊंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यांसाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्रितपणे विविध टप्प्यांवर कार्यवाही सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात कृषि विभागातील 12 हजार 111 व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति (ग्रामसखी ) 30359 यांचे फार्मर कप व गटशेतीचे महत्त्व यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 45 हजार 190 शेतकरी व कृषिसखी यांना फार्मर कप उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात 36 प्रशिक्षण केंद्रावर शेतकरी व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति अशा 32 हजार 993 शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण एप्रिल 2026 अखेर पूर्ण करण्यात आले.चौथ्या टप्प्यामध्ये गटशेतीतूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात.शेतीचा खर्च कमी होऊन पिकाची उत्पादकता वाढविता येते, कृषि विद्यापीठाच्या शेतीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला , तर शेतकऱ्यांचा प्रवास समृद्धीकडे होईल. यासाठी शेतकरी गट बांधणीमध्ये शेतकऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व एक पीक, एक गट अंतर्गत 25 हजार 823 शेतकरी गट फार्मर कप उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत.पाचव्या टप्प्यामध्ये शेतकरी गटांना ज्ञान मिळावे यासाठी कृषी विद्यापीठातील शात्रज्ञ यांच्या मदतीने खरीप हंगामामधील पिकासाठी दररोज डिजिटल शेतीशाळा 25 मे 2026 पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सहाव्या टप्पयामध्ये 25 हजार 823 शेतकरी गट शेतीत येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी “सत्यमेव जयते फार्मर कप 2026” साठी सज्ज झाले आहेत, स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवात केली आहे.
फार्मर कप म्हणजे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून समृद्धीकडे वाटचाल करणे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी माहिती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
